अंधार
एक होता करोडपती. पण होता अगदी कवडीचुंबक.
एकदा एक कवी ह्या कोट्यधीशाच्या घरी आला आणि त्यानं त्याची खुप प्रशंसा केली. अर्थातच सरस्वती-पुत्राची अपेक्षा होती की लक्ष्मीपुत्र खूष होऊन काही देईल. पण तसं त्यावेळी काही घडलं नाही.
कवडीचुंबकाचा निरोप घेऊन कवी जावयास निघणार एवढयात यजमानाचे काही मित्र त्याला भेटावयास आले. त्यांच्यावर वजन मारण्याकरिता करोडपतीनं आपल्या मित्रांना कविराजाची ओळख करून देत म्हटलं, "हे फार मोठे कबी आहेत. माझ्यावर केलेली कविता त्यांनी मला आत्ताच ऐकवली.'' नंतर कवीकडं वळून तो म्हणाला, "कविवर्य, आपण उद्या या. मी आपला यथोचित सत्कार करीन."
दुसऱ्या दिवशी तो कवी ठरल्याप्रमाणं करोडपतीकडं आला तेव्हा त्याला अजिबात ओळख न दाखवता करोडपतीनं त्याला विचारलं, "कोण आपण? काय काम आहे आपलं?"
शेठजी, मी काल आपणाला भेटू न गेलो. आपण आज मला यायला सांगितलं होतं," कवी अदबीनं म्हणाला.
"अस्सं ! अस्सं !" करोड़पती म्हणाला, "आता माझ्या लक्षात आलं, मी आपणाला का बोलावलं ते !"
क्षणभर थांबून नंतर करोडपती म्हणाला, "काय हो, मी तुम्हाला कशाबद्दल काही द्यायचं ? तुम्ही मला माझ्यावर कविता लिहून प्रसन्न केलं, मी तुम्हाला मोठे कवी म्हणून खूप केलं. झाली फिट्टंफाट आता माझ्याकडून आणखी बक्षिसाची कसली अपेक्षा करता? चला, चालायला लागा इथून नि पुन्हा माझ्याकड परत येऊ नका !"
त्या घटनेनंतर काही दिवसांनी त्या कवीची आणि बिरबलाची योगायोगानं गाठ पडली. त्यावेळी कवीनं त्या करोडपतीबद्दल आपला अनुभव बिरबलाच्या कानी घातला.
बिरबलानं त्या गोष्टीवर विचार केला आणि म्हटलं, "कविराज, काही चिंता करू नका. त्या कंजूष करोडपतीला तुम्हाला मानधन द्यायला लावलं नाही, तर माझे नाव बिरबल नव्हेच !"
बिरबलानं नंतर त्या कवीच्या एका दोस्ताला त्या धनाढ्याशी मैत्री जोडायला सांगितली आणि त्यांची चांगली गाढ दोस्ती निर्माण झाल्यावर, एके दिवशी करोडपतीला घरी भोजनाला बोलावून, अगदी उपास घडवायला सांगितलं,
बिरबलाच्या मसलतीप्रमाणं त्या कवीच्या मित्रानं सारं केलं आणि त्याला एके दिवशी जेवावयासही बोलावलं. बिरबल आणि कवी या दोघांनाही त्यानं आमंत्रित केलं.
बिरबल, कवी आणि करोडपती त्या कवी-मित्राच्या घरी अगदी वेळेवर सकाळच्या भोजनासाठी जमले. बारा वाजले तरी त्यांच्या गप्पा संपेनात.
खरं म्हणजे त्यांनी-बिरबल, कवी आणि कवी-मित्र-यांनी अगोदरच संधी साधून जेवण उरकून घेतले होतं. म्हणून त्यांना भूक लागायचा प्रश्नच नव्हता. कंजूष करोडपती मात्र जेवावयास जायचं असल्यामुळे आपल्या घरून काहीच न खाता आला होता आणि परिणामी त्याच्या पोटात मात्र भुकेचा डोंब उसळला होता.
आणखी काही वेळ गेला तरी जेवायच्या गोष्टी कुणीच करीना, हे पाहून करोडपतीला राहवेना आणि त्यानं अखेरीस विचारलं, "जेवायला अजून वेळ आहे का?"
"जेवण? जेवण तर कधीच आटोपलं आमचं !" कवी-मित्रानं (यजमानानं) उत्तर दिलं. "केवळ आपल्याला खूष करण्यासाठी भोजनाला बोलावलं होतं !"
कवी मित्राचं हे खवचट बोलणं ऐकून करोडपती वैतागला आणि तो उठून जाऊ लागला. तेव्हा इतरांनी अडवलं आणि बळच बसवलं.
भुकेमुळे करोडपती अगोदरच कासावीस झाला होता. तशात ते सारे त्याला हलूही देण्यास तयार नव्हते. मग मात्र करोडपती मुद्यावरून गुद्यावर येऊ लागला, तेव्हा त्याच्यावर डाफरत बिरबल म्हणाला, "वा, शेठजी चांगलं ! आता आपल्या अंगाशी आलं तेव्हा हाणामारीच्या गोष्टी करू लागलाय काय? त्या दिवशी या बिचार्या कवीला आपल्या नाटकी बोलण्यानं फसवलंत, तेव्हा मात्र काहीच वाटलं नाही तुम्हाला !"
"तू कोण मला विचारणारा ?" कंजूष करोडपती बिरबलावर खेकसला.
“मी, बिरबल !" उत्तर आलं.
आपल्याशी बोलणारी व्यक्ती बिरबल आहे हे कळताच करोडपतीनं त्याचे पाय धरले आणि म्हणाला, "महाराज, माफ करा मला. मी पुन्हा अशी थट्टा करणार नाही. मी या कविराजांची आता अगदी योग्य आदरसत्कार करीन. येऊ दे आताच त्यांना माझ्याबरोबर !"
बिरबलानं आपलं म्हणणं खरं केलं होतं. कवी त्याच्याकडं कृतज्ञतेने पाहत राहिला.
अंधार
"जगातील अशी एकमेव वस्तू कोणती, की जी सर्वांना दिसते, पण चंद्र-सूर्याला दिसू शकत नाही !" बादशहानं बिरबलाला विचारलं.
"अंधार, सरकार !" बिरबलानं तात्काळ उत्तर दिलं.